सासवड:लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते बारामती व मावळ मतदार संघात अडकविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. एवढं होऊनही बारामती व मावळमधील पराभव ते टाळू शकत नाहीत, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आज येथे व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सासवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उमेदवार कांचन कुल, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, आमदार राहुल कुल, पुरंदर व हवेली मतदार संघातील भाजप शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीच्या 48 जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतानाच खासदार काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांचे जाहीर सभेत कौतुक केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलगी बारामतीतून उभी आहे तर, अजित पवारांचा मुलगा मावळमध्ये आहे. राष्ट्रवादीचे राज्यभरातील नेते या दोन मतदार संघात अडकवून ठेवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. राष्ट्रवादीने बाकीचे मतदार संघ आताच सोडून दिलेत, पण त्यांचे हे दोन्ही म्हणजे बारामती व मावळ लोकसभा मतदार संघ निवडून येणार नाहीत. त्यांचा पराभव निश्चित होणार आहे.
बैलगाडा शर्यत सुरु करा!
पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचं महत्व जास्त आहे. बैलगाडा शर्यतीला मान्यता मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केली.