प्रत्येक सिनेमात एक गोष्ट असते आणि त्या गोष्टी अवती भोवती सिनेमाचे कथानक गुंफले जाते. परंतु सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी देखील अनेक गोष्टी घडतात. एक्सपांशन फिल्म्स प्रा.लि.निर्मितीसंस्थेअंतर्गत पद्मश्री शेवाळे निर्मित, रवींद्र शेवाळे दिग्दर्शित बिस्किट सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान एक मोठा किस्सा घडला. जुन्नर जवळ खिरेश्वर गावात डोंगराच्या पायथ्याशी सिनेमातील एका दृश्याचे चित्रीकरण सुरु होते. शशांक शेंडे, पूजा नायक, अशोक समर्थ, दिवेश मेडघे या कालाकारांचा त्यात समावेश होता.
दिग्दर्शक रवींद्र शेवाळे यांनी सांगितले कि, एप्रिल महिन्यात आम्ही चित्रीकरण करत असल्याने पावसाची जरा देखील शक्यता नव्हती. आमचं चित्रीकरण सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होतं, एकतर लोकेशन हे डोंगर पायथ्याशी असल्याने तिथे वस्ती नव्हती. अचानक पाउस आला आणि आमच्या सर्वांची तारांबळ उडाली. कलाकार आणि तंत्रज्ञ हे मिळेल तिथे आसरा शोधू लागले. पण मुख्य कलाकरांना नेमकी कुठेच जागा मिळाली नाही. जवळच एक जनावरांचा गोठा होता, तिथेच आम्ही आणि सर्व कलाकारांनी मोर्चा वळवला. एकतर जागा खूप छोटी होती, त्यात पाऊस सलग आठ ते नऊ तास थांबेना. जेवणापासून सगळ्याच गोष्टीची अडचण झाली. परंतु सर्व कलाकरांनी गैरसायीची तमा न बाळगता गोठयात पूर्ण वेळ काढला आणि पाऊस बंद झाल्यावर पुन्हा त्याच जोमाने कामाला सुरुवात केली.
पद्मश्री शेवाळे यांची ही पहिलीच चित्रपटनिर्मिती आहे. कथा आणि संकल्पना देखील त्यांचीच आहे. सुप्रसिद्ध पटकथा लेखक सचिन दरेकर यांनी सिनेमाची पटकथा लिहिली असून, सवांद नामदेव मुरकुटे यांचे आहे. डोळ्याची पारणे फेडावीत अशी दृश्य किशोर राउत यांनी त्यांच्या सिनेमाटोग्राफीतून दाखवली आहेत. चैतन्य अडकर यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे. बिस्किट म्हणजे कोमल मनाच्या लहानग्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांचा वेध घेणारा सिनेमा होय. त्यांना पडणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतांना सर्व सिनेमा घडतो..२४ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.