पुणे-पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांना फायदा होण्यासाठीच कालव्यातून पाणी सोडले गेले. शहरावर पाणी कपातीचे संकट असताना कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बापटांवर पाणीप्रश्नावर टीका केली आहे.
पावसाळ्यात पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे भरली होती, मात्र पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले नाही, त्यामुळे शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईला गिरीश बापट हेच जबाबदार आहेत, दौंड, इंदापूरला पाणी सोडण्यासाठी बापट यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मोहन जोशी यांनी केला.