नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आज (शुक्रवार) पंचत्त्वात विलीन झाले. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वाजपेयी यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी वाजपेयी यांच्या अंतिम क्षणांचे साक्षीदार असलेले हजारो उपस्थित लोक साश्रू नयनांनी हात जोडून उभे होते. वाजपेयी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या नात निहारिका यांनी तिरंगा ग्रहण केला.यावेळी राष्ट्रीय स्मृती स्थळावर शांतता पसरली होती. उपस्थित सर्वजण दु:खात बुडालेले होते. त्यांच्या कन्या, नात आणि कुटुंबीयांसह स्मृतिस्थळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. ते नेहमी मैत्रीचा हात पुढे करत गेले, त्यांना शत्रू कुणीच नव्हते. याचीच प्रचिती आज त्यांना अंतिम निरोप देताना येत होती. राष्ट्रीय स्मृती स्थळावर सैन्याच्या तिन्ही दलांनी वाजपेयी यांना अखेरची सलामी दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाजपेयी यांचे जवळचे जुने मित्र लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज वाजपेयीं यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृती स्थळी उपस्थित होते.
7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
त्यांच्या निधनावर 7 दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी देशातील 12 राज्यांनी राजकीय शोक आणि अवकाशाची घोषणा केली. यात दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, ओडिशा, पंजाब, बिहार, झारखंड, हरियाणा, तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सरकारी कार्यालय, शाळा आणि कॉलेजांमध्ये अवकाश ठेवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांनीही सर्व बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अटलजींनी गुरुवारी संध्याकाळी 5.05 वाजता एम्समध्ये शेवटचा श्वास घेतला होता. ते 9 वर्षांपासून आजारी होते आणि 67 दिवसांपासून एम्समध्ये अॅडमिट होते.
राष्ट्रीय स्मृतिस्थळावरच बनणार अटलजींचे स्मारक:
यमुना किनारी राष्ट्रीय स्मृतिस्थळावर दीड एकर जमिनीवर अटल बिहारी वाजपेयींचे समाधि स्थळाची निर्मिती होईल. यूपीए सरकारने नदीकिनारी समाधि स्थळ बांधण्यावर रोख लावली होती, परंतु मोदी सरकारने या निकालाला फिरवून तेथे समाधी स्थळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मोदी सरकार लवकरच अध्यादेश आणू शकते.
पाकचे कायदे मंत्री आज दिल्लीला येणार:
भूतानचे नरेश जिग्मे खेसर नामगेयाल वांगचुक, नेपाळचे परराष्ट्र मंत्री पी. के. ग्यावाल, श्रीलंकेचे कार्यकारी विदेशी मंत्री लक्ष्मण किरीला, बांग्लादेशचे विदेश मंत्री अबुल हासन महमूद अली आणि पाकिस्तानचे कायदे मंत्री अली जफर अटलजींना श्रद्धांजलि वाहण्यासाठी आज दिल्लीला पोहोचणार आहेत.
अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्रिटन आणि बांग्लादेशने व्यक्त केला शोक:
पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे नेता आणि पंतप्रधानपदी जात असलेले इमरान खान म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. भारत-पाक संबंधांमध्ये सुधारासाठी त्यांच्या प्रयत्नांना नेहमी आठवले जाईल. चीनचे राजदूत लुयो झाओहुई यांनी ट्वीट केले- “अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे.” भारतातील अमेरिकी दूतावासाने म्हटले, “माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या सत्ताकाळात अमेरिकेच्या सोबत मजबूत संबंधांवर भर दिला.” ब्रिटन आणि जपानच्या राजदूतांनी म्हटले की, ते वैश्विक नेत्यांपैकी एक होते. बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी म्हटले की, बांग्लादेशच्या लोकांमध्येही अटल बिहारी वाजपेयी खूप लोकप्रिय होते.
मोदी म्हणाले- वडिलांचे छत्र हरपले:
नरेंद्र मोदींनी अटलजींना श्रद्धांजली देत म्हटले की, त्यांचे जाणे वडिलांचे छत्र हरपल्यासारखे आहे. यापूर्वी त्यांनी ट्विटमध्ये म्हटले- ‘‘मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है। हम सभी के श्रद्धेय अटलजी हमारे बीच नहीं रहे। यह मेरे लिए निजी क्षति है। अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था। उनका जाना, एक युग का अंत है।’’