पुणे-व्यक्तिच्या आयुष्यातील साधारणतः पंचावन्न ते साठ वर्षे वयाचा व त्यापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो. आणि वयोमानाप्रमाणे माणसाचे शरीरदेखील बदलत असते. वृद्धत्व हा नैसर्गिक नियम असला तरी त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाब, संधिवात, हृदयरोग, मुत्रविकार या प्रकारचे अनेक आजार घेऊन येतो. परंतु समाजामध्ये असे खूप कमी लोक असतात जे आपल्या वृद्धावस्थेत देखील आजच्या तरुण पिढीमध्ये एक नवा आदर्श घालून देतात.
साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे नुकतीच ९२ वर्षांच्या श्री व्यंकटेश कुलकर्णी या आजोबांवर अवघड अशी शस्त्रक्रिया पार पाडली. मुळचे कर्नाटकचे असलेले कुलकर्णी यांची वयाच्या ८३ व्या वर्षी डाव्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. परंतु काही दिवसांपूर्वी चालताना त्यांच्या उजव्या गुडघ्यामध्ये अचानक वेदना होण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना दाखविले तेथील डॉक्टरांनी त्यांचा एक्स-रे काढला असता त्यांच्या असे लक्षात आले की, कुलकर्णी यांचा गुडघा बरा होण्यासाठी शस्त्रक्रीयेशिवाय पर्याय नाही. परंतु काही कारणामुळे त्यांना हैदराबाद येथे शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुण्यातील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला.
साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ नीरज आडकर यांनी कुलकर्णी यांना तपासले असता त्यांच्या असे लक्षात आले की, कुलकर्णी यांना बेडवर देखील हालचाल करता येत नव्हती तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर वेदना सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांची त्वरीत टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.
याविषयी अधिक माहिती देताना साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीचे संचालक आणि सांधेरोपणतज्ञ डॉ नीरज आडकर म्हणाले की, “ही शस्त्रक्रिया आमच्यासाठी खूप कठीण होती, कारण रुग्णाचे वय हे खूप जास्त असल्याने आम्हांला अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे होते. परंतु कुलकर्णी यांनी उत्तम असे सहकार्य केल्यामुळे आम्हांला ही शस्त्रक्रिया करणे सोपे गेले.”
यावेळी साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथील भूलतज्ञ डॉ तृप्ती पारे म्हणाल्या की, “कुलकर्णी यांचे वय लक्षात घेता आम्ही त्यांना पूर्णपणे भूल दिली नाही तर फक्त त्यांच्या पायाला भूल दिली. ज्यामुळे त्यांना कमीत कमी त्रास होईल याचा आम्ही प्रयत्न केला.”त्या पुढे म्हणाल्या की, “श्री कुलकर्णी यांना सेगमेंटल एपिड्युलर वर रुग्णाचे व्यवस्थापन करण्यास ठेवण्यात आले होते. त्यांचे वय व कार्डीओलॉजिकल स्थिती देखील आव्हानात्मक होती.”
यावेळी बोलताना श्री व्यंकटेश कुलकर्णी म्हणाले की, “माझे हृदय अजूनही तरुण आहे आणि माझ्यामध्ये खूप उर्जा आहे. मी माझे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगले आहे. शस्त्रक्रियेनंतर सुद्धा मी माझ्या पायावर उभे राहू शकतो आणि चालू देखील शकतो . यासाठी मी डॉ. नीरज आडकर आणि संपूर्ण हॉस्पिटलचे आभार मानतो.”