मुंबई- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला आहे. अशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय जडली आहे. त्यांच्याकडे सध्या पक्षाचे काम उरलेले नाही’, असा टोला त्यांनी लगावला.28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही घेतली जाईल, त्यामुळे कामाला लागा, असे भाकित अशोक चव्हाण यांनी केले होते. चव्हाणांच्या भाकितावर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. प्रशासनात आणि राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत.अशोक चव्हाणांचे वक्तव्य देखील तोच प्रकार आहे. चव्हाणांचे भाकित चुकीचे आहे. राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पायाखालची जमीन सरकल्याने चव्हाण यांनी मत मांडले असावे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच म्हणजेच 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा भंग करतील आणि लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक होईल. त्यांची तयारी सुरू असल्याचे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी औरंगाबादेतील राजीव गांधी मैदानावर काँग्रेसची सभा झाली त्या वेळी त्यांनी हे भाकीत वर्तवले.ते म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची तयारी सुरू आहे. म्हणून फडणवीस विधानसभा मुदतीपूर्वीच गुंडाळतील. आपण सज्ज असले पाहिजे. याबद्दलचा अधिक तपशील मात्र चव्हाण यांनी दिला नाही. ते म्हणाले की, या वेळी पुन्हा केंद्रात मोदी सरकार आले तर त्यानंतरच्या पाच वर्षांनी आपल्याला मतदानाचाही अधिकार शिल्लक राहणार नाही. गेल्या वेळी त्यांनी भरपूर घोषणा केल्या होत्या. आता येत्या काही दिवसांत पुन्हा घोषणांचा पाऊस पडेल.