सांगली, कोल्हापुर आणि इतरत्र अतिपर्जन्य होऊन नद्यांना महापुर येऊन अनेक गावे पाण्याखाली गेली. त्या गावांतील सर्व घरे पाण्याखाली गेल्याने हजारो कुटूंब बेघर झाली. जनावरांची फार मोठी हानी झाली. प्रसार माध्यम, दुरदर्शन मुळे संवेदनशीलतेची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची संवेदनशिलता जागृत झाली आणि तातडीचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी, बिस्कीटे ,इतर खाद्य पदार्थांचे आणि कपड्यांचे मदतीचे ट्रक, टेम्पो कोल्हापूर व सांगलीकडे जाऊ लागले.
राळेगणसिध्दी परिवाराने एक ट्रक साहित्य पाठविले होते. पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाने ही एक ट्रक साहित्य पाठविले. महाराष्ट्रातील विविध भागातून मदतीचा ओघ सुरू आहे. सरकार पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या परिने अथक परिश्रम करत आहे. पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी सैनिकांनी जे काम केले त्याला तोड नाही. राळेगणसिध्दी परिवारातील तरूणांनी तेथे पाहिलेल्या बाबींबद्दल सांगत असताना आणि परिस्थितीचे फोटो पाहताना अतिव दुःख होत होते. पुर ग्रामस्थांना मदत करून काही गावातील सैनिक गावाचा निरोप घेऊन गाव सोडून चालले होते त्यावेळी त्या गावातील महिला सैनिक भावांना राखी बांधून निरोप देत होत्या आणि दोन्ही बाजूंनी अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हे पाहणाऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू दिसत होते. ह्रदय दाटून येत होते. या परिस्थितीला कोण दोषी आहे? वगैरे गोष्टींचा उहापोह करण्याची आजची वेळ नाही. पुरग्रस्तांना तातडीची मदत मिळणे महत्वाचे आहे.
आता पुर कमी झाल्यानंतर आम्हा जनतेचे महत्वाचे कर्तव्य आहे की, जी घरे पाण्याखाली गेल्यामुळे त्या कुटूंबातील माणसे फक्त अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडली आहेत त्या माता-भगिनी, मुले आणि पुरूष मंडळी यांच्या दैनंदिन वापरात येणाऱ्या कपड्यांची गरज आहे. घरे पाण्याखाली गेल्यामुळे अंथरूण-पांघरूणासाठी वापरणारे कपडे पाण्यात कुजली, शाळेत जाणाऱ्या मुलांची वह्या पुस्तके पाण्यात गेली. त्या मुलांना वह्या पुस्तकांची नितांत गरज आहे. दररोज वापरात येणारी स्वयंपाक, जेवणाची आणि इतर भांडी मोठ्या प्रमाणात निकामी झाली आहेत. पुर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखल झाला असल्याने आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी गावात रोगराई पसरू नये म्हणून त्यांना जंतुनाशक औषधांची गरज आहे. जनतेने प्रयत्न करुन जी जनावरे वाचली आहेत त्यांना पशुखाद्याची गरज आहे. काही घरांची दृष्ये पाहिली आहेत. कच्ची घरांची पडझड झाली आहे. अशा कुटुंबांना तातडीचा निवारा करण्याची गरज आहे.
शासन आपल्या परीने प्रयत्न करित आहे. पण अचानक आलेल्या आपत्तीमुळे शासन प्रत्येक कुटुंब किंवा माणसापर्यंत पोहचेल की नाही हा प्रश्न आहे? कारण काम मोठे आहे. त्यासाठी माणवतेच्या दृष्टीने आम्हा सर्व जनतेने कर्तव्य भावनेने सेवाभावाने हे काम यथा शक्तीने वाटून घेणे आवश्यक आहे. विशेषःता ईश्वराने समाजातील ज्या ज्या व्यक्तींना धन, दौलत सर्व काही दिले आहे अशा माणसांनी या आपत्ती मध्ये त्यांचे दुःख वाटुन घेणे आवश्यक आहे. दुःखी पिडीत, रंजले- गांजलेल्या माणसांच्या दुःखात सहभागी होणे हिच खरी ईश्वर सेवा आहे. राजकारण, धर्मकारण, समाजकारण यांचा उद्देश हाच आहे की समाजाची सेवा घडावी.
माझे वय 82 वर्षे आहे. जनतेची सेवा घडावी म्हणून आयुष्यात जनसेवेचे व्रत घेतले पण वयानुसार त्या सेवेला मर्यादा आल्या आहेत, बँक अकाउंट कुठे असतो हे माहीत नाही. फक्त जनतेची सेवा घडावी हेच व्रत घेऊन काम करित आलो. सर्वांना माझे सारखे जनतेच्या सेवेसाठी आयुष्य देणे शक्य होणार नाही हे मी समजू शकतो. पण आज जी माणसे महापुरासारख्या आपत्ती मध्ये सापडली आहेत आणि ईश्वराने आपल्याला सर्व दिले आहे अशा माणसांनी आज आपत्ती मध्ये सापडलेल्या माणसांना शक्य होईल ती मदत करणे मानवी जीवनाचे कर्तव्य आहे. गुजरातमधील भूकंपामध्ये कच्छ मध्ये मी सहा महिने राहून त्या भूकंपग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला.
दुःखी पिडीतांची सेवा हीच खरी ईश्वराची पुजा समजून आपणही आपल्या परिने सेवा करावी ही विनंती. या कामासाठी ईश्वराने सर्वांना सदबुद्धी द्यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आपला,
कि. बा. तथा अण्णा हजारे
दि. 13/08/2019
राळेगणसिद्धी