पुणे : सूस व म्हाळुंगे ही दोन्ही गावे महापालिका हद्दीत नसली तरी, पुण्याच्या उपनगरांप्रमाणेच त्यांची वाढ झाली आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुणे महापालिकेने या दोन्ही गावातील रहिवाश्यांना सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा करावा यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पुढाकाराने महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग व संबंधीत दोन्ही ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकत्रित बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही गावातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पिण्यासाठी नियमित ५ लाख लिटर पाण्याची पूर्तता करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली.
बैठकीस पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, म्हाळुंगे गावचे सरपंच मयुर भांडे, सूस गावच्या सरपंच अपूर्वा निकाळजे, नारायण चांदेरे, शांताराम पाडाळे, युवराज कोळेकर, संतोष मोहोळ, विवेक खैरे, रुपेश पाडाळे, मनोज पाडाळे, अनिकेत चांदेरे, गणेश साळुंखे, सचिन चांदेरे, गजानन चांदेरे, बाळू निकाळजे, शुभांगी ससार, दिशा ससार, दिपाली पारखे, वृषाली चांदेरे, सीमा निकाळजे, कनिष्ठ अभियंता मदन अढारी, अभियंता महेंद्र बहिराम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या हद्दीपासून पुढे पाच किमीच्या आत येणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. सूस व म्हाळुंगे या गावांचा पाणी प्रश्न सोडवणे आमचे कर्तव्य आहे. पुणे महापालिकेकडून या गावांना 4 ते 5 लाख लिटर पाणी देण्यात यावे आणि बाणेर-बालेवाडी-पाषाण या भागाचा ज्याप्रमाणे पाणी प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे या दोन्ही गावांचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी भूमिका नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिकेच्या प्रशासनासमोर मांडली. दोन्ही गावच्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी हा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी यावेळी केली. तसेच, पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांना त्यासंदर्भात लेखी निवेदनही दिले.