नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला असून हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.
काँग्रेसने उत्तरप्रदेशमध्ये दोन सरचिटणीस नियुक्त केले आहेत. यानुसार उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी ज्योदिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे. एक फेब्रुवारीपासून प्रियांका गांधी आपली जबाबदारी सांभाळतील.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भातील घोषणा केली आहे. 47 वर्षीय प्रियांका यांची तुलना अनेकवेळा त्यांच्या आजी आणि भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली होती. काँग्रेसने त्यांनाच लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. परंतु, आपले बंधू तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पुढे केले. 2004 पासूनच आपल्या आई तसेच यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना उपस्थिती लावली. परंतु, सक्रीय राजकारणापासून स्वतःला दूरच ठेवले. आता मात्र, काँग्रेसने त्यांना सरचिटणीस पद देऊन सक्रीय राजकारणात उतरवले आहे.
देशात लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा मार्ग हा उत्तर प्रदेशातूनच जातो असे म्हटले जाते. या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. या जागा ज्यांच्या त्यांचीच केंद्रात सत्ता असल्याचा इतिहास आहे. अशात काँग्रेस केवळ एक जबाबदार व्यक्ती निवडून उत्तर प्रदेश काबीज करू शकणार नाही ही गोष्ट काँग्रेसला समजली असावी. त्यामुळेच, काँग्रेसने प्रियांका गांधी वढेरा यांना सक्रीय राजकारणात उतरवले असे सांगितले जात आहे. मुळातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात लोकसभा निवणडुकीत कुठलाही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस तयार नाही हेच प्रियांकांना राजकारणात उतरवून पक्षाने सिद्ध केले आहे.