पुणे-आतापर्यंत पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना आता देशातील पहिल्या कार्यान्वित झालेल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातुन दररोज पाच लाख प्रक्रिया केलेले पाणी आणि पेशवेकालीन उच्छवासातून ४५ लाख लिटर असे दररोज पन्नास लाख लिटर पाणी मिळत आहे,त्यामुळे तळजाई टेकडी आता वर्षभर हिरवीगार राहणार आहे,असा दावा माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली.
पुणे महापालिकेच्यावतीने आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून अंघोळीचे आणि स्वयंपाकाच्या पाण्यावर प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी तळजाई टेकडीवर जलवाहिनीतून पोहचविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, तळजाई टेकडीवर १०७ एकर क्षेत्रात वसुंधरा जैव वैविध्य उद्यान हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून साकारला जात आहे. नुकतेच येथे
नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर येथे एक लाख चौरस फुटाचे कै. सदू शिंदे क्रीडांगणही उभारण्यात आले आहे.
आजपर्यंत या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी ,प्राणी -पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. विशेषतः आजपर्यंत या टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते मात्र कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर अडीच किमीच्या जलवाहिनीद्वारे आता प्रक्रिया केलेले पाच लाख लिटर पाणी पोहचत आहे. मात्र येथील वनसंपदा हिरवीगार ठेवण्यासाठी पेशवेकालीन उच्छवासातून आता ४५ लाख लीटर पाणी उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे .पाच- सात वर्षांपूर्वी पेशवेकालीन उच्छवासाचा उन्हाळ्यात उपयोग करण्यात आला होता. आता ग्रे वॉटरचे पाच लाख आणि पेशवेकालीन पाणी योजनेच्या उच्छवासाचे ४५ लाख असे दररोज पन्नास लाख लिटर पाणी येथे मिळत आहे. त्यामुळे आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार आहे. शिवाय
वसुंधरा
जैव वैविध्य उद्यान प्रकल्पाला या पाण्याचा उपयोगही होत आहे.तसेच जमिनीत पाणी मुरून भूगर्भातील पाणीसाठाही वाढणार आहे. वनसंपदा आणि प्राणी -पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि टेकडीचे संवर्धन यामुळे पर्यावरणप्रेमींही सुखावले आहेत. लवकरच सौरउर्जेवरील ३०० किलोवॅटचा आदर्शवत प्रकल्पही कार्यान्वित होणार आहे.
एकीकडे धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता पिण्याच्या पाण्यासाठी पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. यापार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी अन्य उपयोगासाठी वापरले जाऊ नयेत,त्यासाठी ग्रे – वॉटर प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत आणि पाण्याचा पुनर्वापर सहज शक्य आहे. त्यासाठी अंघोळीचे आणि स्वयंपाकाच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे,अशी अपेक्षाही आबा बागुल यांनी व्यक्त केली.