पुणे – शहरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपकडून पोरखेळ सुरु असल्याची टीका करून माजी उपमहापौर आबा बागुल यांनी वादग्रस्त ठरलेल्या टाक्यांच्या उभारणीबाबतचा चौकशी अहवाल पालिकेच्या मुख्यसभेसमोर मांडला पाहिजे अशी आग्रही मागणी केली आहे. शिवाय हे प्रकरण पाहता सत्ताधारी कशाच्या आधारे कर्जरोखे उभारणीसंदर्भात विदेशी कंपन्यांशी बोलणी करीत आहेत? असा सवालही आबा बागुल यांनी केला आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, शहरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील विविध भागात पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा, तसेच त्यासाठी झालेली प्रक्रिया याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . विभागीय आयुक्तांनी चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सरकारकडे पाठविण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशानात या कामाच्या निविदेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता . त्या वेळी संपूर्ण चौकशी केली जाईल, तोपर्यंत हे काम थांबविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही टाक्यांचे काम सुरू होते, सल्लागारावर पैसे खर्च करण्यात आले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाक्यांची कामे थांबविण्याचे आदेश दिले नाही तोच नंतर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थगिती आदेश उठविण्याची विनंती केली होती या पार्श्वभूमीवर आबा बागुल यांनी भाजपकडूनच पाण्यावरून पोरखेळ सुरु असल्याची टीका केली आहे, त्यांनी म्हटले आहे कि चोवीस तास पाणी पुरवठा म्हणजे नेमके काय आहे ? धरणातील पाणीसाठ्याची उपलब्धता कशी आहे याचा कोणताही विचार न करता टाक्या उभारून आणि जलवाहिन्या टाकून ही योजना होणार आहे का ? असा प्रश्नही बागुल यांनी उपस्थित केला आहे तसेच पाण्याच्या नावाखाली कर्जरोखे उभारणीसंदर्भात विदेशी कंपन्यांबरोबर बोलणी कशाच्या आधारे आणि कशासाठी सुरु आहे ?आणि पुणे महापालिकेला गहाण टाकण्याचा डाव आहे का? याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
खुलासा आवश्यक
कर्जरोखे उभारून पुणेकरांवर आर्थिक भुर्दंड लादणे अयोग्य आहे. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसंदर्भात साशंकता असलेल्या मुद्द्यांबाबत मुख्यसभेसमोर खुलासा होणे आवश्यक आहे आणि या योजनेसंदर्भात पालिकेच्या सभागृहात पुणेकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना निर्णय घेऊ द्या अशी अपेक्षाही आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे.