डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी कठीण शस्त्रक्रिया यशस्वी
पुणे-प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आई- वडील होणे ही खूप सुखाची गोष्ट असते. शिरूर येथील श्री व सौ साकोरे यांच्या आयुष्यात देखील हा सुखाचा क्षण १४ मार्च २०१९ रोजी आला. भोसरीतील एका खाजगी रुग्णालयात साकोरे दाम्पत्याला मुलगा झाला. परंतु जन्माच्या दुसऱ्याच दिवशी बाळाच्या नाकात लावण्यात आलेल्या नलिकेतून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊ लागला. हा रक्त स्त्राव काही केल्या थांबत नव्हता. यामुळे डॉक्टरांनी या बाळाला ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे हलवण्याचा निर्णय घेतला.
ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे आणल्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. येथील बालरोग तज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे यांनी बाळाची तपासणी व उपचार करून देखील काही केल्या हा रक्त स्त्राव थांबत नव्हता. २ दिवसाच्या कठीण परिश्रमानंतर बाळाच्या तोंडातून/नाकातून येणारा रक्त स्त्राव थांबवण्यात त्यांना यश आले.
मात्र व्हेंटिलेटर व औषधोपचारानंतर ७ दिवसांनी बाळाचे पोट फुगले आहे असे लक्षात आले. यावेळी डॉक्टरांनी पोटाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बाळाचे जठर फुटले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, तेथे २०० ग्रॅम रक्ताची गाठ निर्माणझाली होती व इतर भागात गँगरीन झाल्याचे आढळून आले. यावेळी डॉक्टरांनी तातडीने रक्ताची गाठ काढून फुटलेले जठर शिवले. व त्यात अन्नपदार्थ आल्यास त्याची गळती होणार नाही याची दखल घेतली.
व्हेंटिलेटर वर असतानाच पुढच्या ४८ तासात या बाळाच्या डाव्या फुफ्फुसाला न्यूमोनिया झाला. हे दुसरे आव्हान डॉक्टरांच्या समोर आले मात्र औषधांच्या सहाय्याने हा न्यूमोनिया बरा केला. पुन्हा काही दिवसात (शस्त्रक्रियेच्या ६ दिवसानंतर) त्या बाळाच्या रक्तात फंगल संक्रमण झाल्याचे आढळले, यावेळी त्याला फंगल संक्रमण डोस देण्यात आले. डॉक्टरांच्या २० दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर आता बाळाची तब्बेतीत सुधारणा असून त्याला डिस्चार्जे देण्यात आला.
या बाबत डॉ. श्रीनिवास तांबे म्हणाले की “याबाळाची प्रकृती अतिशय नाजूक होती तशीच ही केस देखील अतिशय दुर्मिळ होती. याची माहिती कोठेही उपलब्ध नसल्याने आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीम ने अनुभवाच्या जोरावर बाळाचा जीव वाचवला .”
ही शस्त्रक्रिया ज्युपिटरच्या पाडियाट्रिक आयसीयूचे प्रमुख डॉ. श्रीनिवास तांबे , पाडियाट्रिक सर्जन डॉ. प्रणव जाधव व डॉ. कल्पेश पाटील यांच्या टीम ने यशस्वीरित्या पार पाडली.
साकोरे दाम्पत्य हे मुळचे शिरूर तालुक्यातील असून त्यांच्या मुळ व्यवसाय हा केवळ शेती हा आहे. त्यांची परिस्थिती बेताची असून, आपल्या पहिल्या मुलाचे प्राण वाचल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.या बाबत बोलताना श्री व सौ साकोरे म्हणाले की, “ बाळाच्या तोंडातून/नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने आम्ही आतिशय घाबरून गेलो होतो. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बाळाला पूर्ण उपचार देणे आमच्या कडून अशक्य होते. मात्र ज्युपिटर हॉस्पिटलने बाळाच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. आम्ही डॉक्टरांनवर पूर्ण विश्वास ठेवून आमचे बाळ त्यांच्या हाती सोपवले. आज उपचारनंतर बाळाच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे पाहून अतिशय समाधान वाटते” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.