मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर १ सप्टेंबर रोजी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपप्रवेशाच्या या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे.दरम्यान शिवसेनेच्या विरोधामुळे आतापर्यंत भाजपने राणेंना पक्षप्रवेश नाकारला होता. मात्र आता भाजपमध्ये इतर पक्षातून येणाऱ्या विद्यमान आमदारांची संख्या वाढल्याने या आमदारांना तिकीट देण्यासाठी भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी तर सुरु केलेली नाही ना ? असाही प्रश्न यामुळे उपस्थित केला जातोय .तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती आणि नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक, सोलापुरातील काँग्रेसचे आमदार आणि एक विद्यमान खासदार या १ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
बेस्ट संयुक्त कृती समितीने सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून वडाळा डेपो येथे बेमुदत उपोषण पुकारले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालावल्याचं कळाल्यानंतर नारायण राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला. तुम्ही येत्या १ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आज दिवसभर चर्चा आहे. ती खरी आहे का? असा सवाल राणेंना पत्रकारांनी विचारला असता, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, असं सांगत राणेंनी येत्या रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या रविवारी राणे भाजपमध्ये प्रवेश करतानाच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असल्याचं सांगण्यात येतं. राणेंसोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजते आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती आणि नातेवाईक माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक, सोलापुरातील काँग्रेसचे आमदार आणि एक विद्यमान खासदार या १ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा सोलापुरात होणार आहे. राष्ट्रवादीचेच आणखी एक नेते भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उस्मानाबादची जागा लढवली होती. त्यात शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. ती त्यांनी फेटाळली होती. नंतर मात्र हळूहळू त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या यात्रेला गैरहजर राहिल्यानंतर त्यांचा निर्णय स्पष्ट झाला होता.
उस्मानाबादचे भाजप नेते आणि प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे.