श्रीनगर- पुलवामा अतिरेकी हल्ल्यात ४० जवानांच्या हौतात्म्यानंतर सीआरपीएफ व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत सीआरपीएफने म्हटले की, ही घटना विसरणार नाही, माफी नाहीच. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ. मोदी म्हणाले, अतिरेकी व त्यांना पोसणाऱ्यांनी मोठी चूक केली आहे. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल. जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ.अतिरेक्यांना संपवण्याचे ठिकाण, वेळ व स्वरूप ठरवण्याचे सर्वाधिकार आता लष्कराला देण्यात आले आहेत. सरकारने १९९६ मध्ये पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. यामुळे पाकिस्तानातून आयात वस्तूंवरील अबकारी शुल्क भारत वाढवू शकतो.
– गुरुवारी शहिदांची संख्या ४४ सांगण्यात आली होती. आता सीआरपीएफने स्पष्ट केले की, ४० जवान शहीद झाले आहेत.सूत्रांनुसार, घटनास्थळी दोन मृतदेह सापडले. एक बसचालकाचा असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
अतिरेकी हल्ल्याविरुद्ध २० राज्यांत निदर्शने, जम्मूतील बंददरम्यान हिंसाचार व तोडफोड, ६ भागांत संचारबंदी
जम्मूतील परिस्थिती तणावपूर्ण होती. बंद काळात निदर्शकांनी १२ वाहनांना आग लावली. अनेक गाड्या फोडल्या. शहरात संचारबंदी लागू केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. विविध घटनांत पोलिसांसह आठ लोक जखमी झाले. रस्त्यांवर अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले. त्यामुळे वैष्णोदेवीला जाणारे भाविक आणि पर्यटकांना अडचणी आल्या.काही काश्मिरी प्रवाशांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलेल्या घोषणाबाजीमुळे शहरांत तणाव होता.
अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्ससह २५ देशांच्या राजदूतांशी भेटून पाकिस्तानच्या नाकेबंदीस सुरुवात
गरज : लष्करी ताफ्याबरोबर इतर वाहने चालवण्यावर बंदी
– सुरक्षा दलांनी श्रीनगरमध्ये तपासणी कडक केली. अनेक ठिकाणी चौक्या लावल्या. पोलिसांनी या हल्ल्याच्या धाग्यादोऱ्यांबाबत स्थानिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
– शुक्रवारी खोऱ्यात सुरक्षा दलांच्या ताफ्याची वाहतूक बंद राहिली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनांसह सामान्य नागरिकांना वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली.
जबाबदारी : पाक वकिलातीपुढे निदर्शने, सीआरपीएफचा बंदोबस्त
– पुलवामा हल्ल्यानंतर देश संतप्त झाला आहे. शुक्रवारी दिल्लीसह अनेक शहरांत निदर्शने झाली. दिल्लीत अनेक संघटनांनी पाक वकिलातीसमोर निदर्शने केली. या वेळी निदर्शक संतप्त झाले होते. निदर्शकांची संख्या सातत्याने वाढत होती. या वेळी पाक वकिलातीसमोर केंद्रीय राखीव पोलिस दलाचेच (सीआरपीएफ) जवान बंदोबस्ताला होते. या जवानांनीच संतप्त निदर्शकांना पांगवले.
तपास : हल्ल्यात ८० किलो आरडीएक्सचा वापर झाला
– पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले. पाक नागरिक कामरानने हल्ल्याचा कट रचल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी गाझीचे नाव आले होते.
– एनआयएच्या तपासानुसार, स्फोटासाठी ६० ते ८० किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. गुरुवारी ३५० किलो आरडीएक्सची बाब समोर आली होती. अतिरेक्याने वाहन बसला धडकवले होते.
आडमुठेपणा : मसूद अझहरला अतिरेकी घोषित करण्यावरून चीनचा आडमुठेपणा कायम
– अतिरेकी मौलाना मसूद अझहरच्या जैश-ए-मोहंमद या संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, चीन आता अझहरच्या बाजूने उभा राहिला आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाचा प्रवक्ता म्हणाला, अझहरला अतिरेकी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नाप्रति चीनच्या भूमिकेत बदल होणार नाही. चीनचा आडमुठेपणा कायम आहे.