पुणे : पालकांनी मुलांसोबत काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याविषयी चर्चा केली पाहिजे. काही विषयावर मुलांबरोबर चर्चा करायला पालक लाजतात. यामुळे बर्याच वेळेला मुलांचे नुकसान होते. यासाठी मुलं आणि पालक यांच्यामध्ये संवाद गरजेचा असल्याचे मत पायल कारवा यांनी व्यक्त केले. ग्यान गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित ‘एक्झुबरंझा’ कार्निवल फेस्टिवल मध्ये त्या ‘गुड टच आणि बॅड ट्च याविषयावर पालकांशी संवाद साधत होत्या.
यावेळी त्यांनी मुलांना त्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांविषयी माहिती नसल्याने घडणारे असुरक्षित प्रसंग टाळण्यासाठी पालक आणि मुलांमध्ये संवाद गरजेचा असल्याचे सांगितले. असुरक्षित स्पर्शा विषयी मार्गदर्शन करताना सुमन मर्चंट यांनी मुलांना कुठे आणि कशा प्रकारे स्पर्श केल्यानंतर असुरक्षित वाटू शकते या विषयी चर्चा केली. अशा स्पर्शाने असुरक्षित वाटल्यानंतर त्याबद्दल न घाबरता आणि न लाजता तातडीने पालकांशी किंवा जबाबदार व्यक्तींशी चर्चा करण्याचा सल्ला दिला.
यावेळी बोलताना शाळेचे संस्थापक जयप्रकाश गोयल यांनी विद्यार्थ्यानी चिंता न करता चिंतन करण्याचे आवाहन केले. तसेच संकटाने खचून न जाता त्या संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या ‘एक्झुबरंझा’ कार्निवल फेस्टिव्हल मध्ये जी.जी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी त्यांना शिकवल्या जाणार्या कलागुणांचे प्रात्यक्षिक करून इतर शाळेतील विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन केले. कार्निवलचे उद्घघाटन अॅडव्होकेट एस. के.मिश्रा आणि डॉ. श्रीधर चिपळूणकर यांनी केले. महानगरपालिका तसेच अन्य शाळेतील जवळपास 4000 विद्यार्थ्यानी या कार्निवल मध्ये सहभाग नोंदवला.
या कार्निवलमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांना बोलवण्यात आले होते. यामध्ये सॅट /अॅक्ट या आंतरराष्ट्रीय परीक्षेविषयी अलेक्झांड्रा गोल्डस्टोन, रसिका वाकलकर यांनी विद्यार्थ्यांना नीटनेटक्या पोषाखाविषयी मार्गदर्शन केले तर स्पोर्ट्स सायकॉलोजिस्ट पी.व्ही.के रमन यांनी पालकांना मुलाची एकाग्रता कशा प्रकारे वाढवायची आणि त्यासाठी योग्य वय कोणते ? याविषयी तर ‘सोच बदलो दुनिया बदलेगी’ या विषयावर कोल प्रबीर सेन गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. ‘कलात्मक लिखाण’ करण्याविषयी लेखक मेहुल दारुका यांनी, ‘कथाकथन’ या विषयावर चेतन व्होरा, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘ताल’ या म्युझिकल बँडने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी जी.जी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यानी सेंद्रिय खत तयार करणे, वर्तमान पेपरच्या माध्यमातून बॅग तयार करणे, मेणबत्ती तयार करणे, योगा, पॉट डेकोरेशन, कॅलिग्राफी, बांबू डान्स, दगडाला आकार देवून विविध प्रकारचे पेपरवेट तयार करणे, जुन्या टी शर्ट पासून बॅग तयार करणे, हसत खेळत गणित शिकणे, वैज्ञानिक खेळणी, लहान लहान खेळांच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल, शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी आदींसह मान्यवर उपस्थित होते.