सिंधुदुर्ग -पाच वर्षाचा शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतो असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला. तर नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नारायण राणेंचं कौतुक करत नारायण राणे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान असून, सर्व विषयाची जाण असणारे नेते असल्याचं म्हटलं. तसंच नारायण राणे भाजपातच होते, त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाचा प्रश्नच नाही असंही त्यांनी म्हटलं. राणेसाहेब भाजपाचे खासदार म्हणून नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात राज्यसभेत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
नितेश राणे यांनी यावेळी अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. “हा प्रवेश मुंबईत व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. पण सिंधुदुर्गातील लोकांचं कणकवलीत प्रवेश व्हावा असं म्हणणं होतं त्यामुळेच येथे प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत एकूण मतदानाच्या ६० ते ७० टक्के मतं मिळतील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना यावेळी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “नितेश राणे आक्रमक आहेत, कारण ते नारायण राणेंच्या नेतृत्त्वात घडले आहेत. पण नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत घेतलं आहे. त्यांना आमच्या शाळेत संयम शिकवणार आहोत. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचं तिथं होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे कणकवली येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपात दाखल झाले. तसेच, त्यांनी आपला स्वाभिमान पक्षही भाजपात विलीन केला आहे. यावेळी नारायण राणेंचे सुपूत्र माजी खासदार निलेश राणे हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राणे कुटुंबातील कोणीही शिवसेनेचा एकदा ही उल्लेख केला नाही. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.